मोदी सरकार विकसित भारताचा अमृतकाल ः आ. विनोद अग्रवाल

0
19

– सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११ वर्षे
– पत्रकार परिषदेत माहिती

गोंदिया : मोदी सरकारचा कार्यकाळ देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहीला जाईल. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत व संकल्प से सिध्दी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल. हा ११ वर्षांचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांना सोबत घेऊन केला आहे. भारताच्या उज्वल भविष्याची पायाभरणी या काळात करण्यात आली आहे. ११ वर्षाच्या कामगिरीची माहिती एका भाषणात किंवा एका पत्रकार परिषदेत देता येणे अवघड आहे. मोदी सरकार म्हणजे विकसित भारताचा अमृतकाल असल्याची माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी आज, ११ जून रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले, जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, जे. डी. जगणीत, भावना कदम, जयंत शुक्ला आदी उपस्थित होते. आ. अग्रवाल पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला तर विकासाला गती मिळते या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुत्रामुळे भाजपा सरकार जेथे जेथे आहे, तेथे तेथे गरीबांचा विकास झाला आहे. सरकार म्हणजे सेवा, या हेतूने आता काम केले जात असल्याने सुशासन ही देशाची संस्कृती बनली आहे. गेल्या ११ वर्षात भारताने अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. मोदी सरकारने भारतीय राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण हा नवा शब्दप्रयोग प्रत्यक्षात आणला आहे. आपण जनतेला जबाबदार आहोत, हे लक्षात ठेऊन मोदी सरकारने कारभार केला आहे. सरकारी कारभारात पारदर्शकता आणून, वेगवेगळ्या सुधारणा करून मोदी सरकारने आपल्या नव्या संस्कृतिचा परिचय जगाला दिला आहे. २०१४ पूर्वी देश भ्रष्टाचाराने पोखरला होता. मोदी सरकारने मात्र देशात विकासाचे युग सुरू केले. पूर्वी सरकारी योजनांचे लाभ जनतेपर्यंत पोहचत नसत. मात्र मोदी सरकारने डीबीटी प्रणालीचा वापर करत सामान्य माणसाच्या थेट बँक खात्यात लाभ पोहचवण्याचे काम केले आहे. ५ लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपलब्ध केले आहेत. मेक इन इंडियामुळे अनेक वस्तू आणि सेवांची निर्यात करत आहोत.
आपण जगात ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो असून ४ थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या ११ वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या संकल्पनेनुसार राज्य कारभार होत असल्यामुळे प्रत्येक नागरिक याचा साक्षीदार ठरला आहे. विशेष म्हणजे, भारताच्या विकासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःकडे घेतले नसून १४० कोटी भारतीयांना दिले आहे.
आ. अग्रवाल पुढे म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमुळे सुरक्षित भारत, समृध्द भारत या मंत्राचा परिचय जगाला झाला आहे. भारतावर दहशतवादी मार्गाने हल्ला चढविला तर, दहशतवाद्यांच्या देशात घुसून जशास तसे उत्तर दिले जाईल, हे ऑपरेशन सिंदूरमुळे जगाला कळले आहे. तसेच भारतात बनवलेल्या संरक्षण उत्पादनांची विश्वासार्हता जगात तयार झाली आहे. यासोबतच गरीब कल्याण अन्न योजना, उज्वला योजना, आवास योजना, जलजीवन मिशन, जनधन योजना, आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी अशा अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. राम मंदिर निर्मिती, काशी विश्वनाथ कॉरीडॉरमुळे मोदी सरकार विकासाबरोबरच देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याला प्राधान्य देत आहे, हे दिसले आहे. जीएसटी सारख्या करामुळे व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपला आहे. ३७० वे कलम रद्द झाल्यामुळे देशाची अखंडता बळकट झाली आहे. सेवा, सुशासन, गरीब कल्याण या संकल्पना कृतीत आणून मोदी सरकारने राज्य कारभार कसा करावा, याचा आदर्श स्थापित केला असून गोंदिया जिल्ह्यात गेल्या ११ वर्षात झालेल्या विकासात्मक कामांची माहिती आ. अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ११ वर्षाच्या कार्यकाळातील विकास पत्रकाचे विमोचन करण्यात आले.