भंडारा: ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि हक्काची ‘जातीनिहाय जनगणना’ अंमलात आणण्यासाठी आज, २२ मार्च रोजी भंडारा शहरात सकल ओबीसी समाजाच्या वतीने विराट महामोर्चा काढण्यात आला. स्थानिक दसरा मैदानावरून निघालेल्या या जनसागराने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय: भगवे व पिवळे वादळ
सकाळी दसरा मैदान येथे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने गोळा झाले होते. येथून निघालेला मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. मोर्च्यादरम्यान ओबीसी एकजुटीच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. या मोर्च्याचे वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी आणि आंबेडकरी संघटनांनीही या लढ्याला जाहीर पाठिंबा देत सहभाग नोंदवला, ज्यामुळे बहुजन ऐक्याचे दर्शन घडले.
सभेत रूपांतर आणि नेत्यांचे मार्गदर्शन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्च्याचे रूपांतर एका मोठ्या सभेत झाले. विचारपीठावर डॉ. बाळकृष्ण सार्वे, प्रभाकर वैरागडे, सदानंद इलमे, गोपाल सेलोकर,उमेश कोर्राम,धनंजय बिरनवार, संजय मते, रोशन जांभुळकर, जयंत झोडे,प्रा. उमेश सिंगनजुडे, ललिता देशमुख यांनी मार्गदर्शन केले.विचारपीठावरून ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांनी समाजावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. “आमची नेमकी संख्या कळल्याशिवाय आम्हाला आमचे हक्क मिळणार नाहीत, म्हणूनच जातीनिहाय जनगणना अनिवार्य आहे,” असा सूर नेत्यांच्या भाषणातून उमटला.
राजकीय नेत्यांची उपस्थिती
या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता, अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी मोर्च्याला भेट दिली. विचारपीठाच्या खाली बसून नेत्यांनी समाजाच्या भूमिकेला समर्थन दिले. यामध्ये प्रामुख्याने आमदार नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
पदवीधर आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
१. ओबीसी समाजाची तातडीने जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
२.UGC विधेयक 2026 लागू करा
३. क्रिमिलेयर मर्यादा वाढवा
मोर्च्याच्या शेवटी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या मोर्च्याला मोठ्याप्रमाणावर ओबीसी बंधू -भगिनीं उपस्थित होते.




