
चंद्रपूर -जिल्ह्यातील गोंदिया–बल्लारशा रेल्वे मार्गावर सिंदेवाही रेल्वे स्टेशनजवळ आज सकाळी एका घटनेत मालगाडीच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला आहे. जंगल परिसर असल्याने या भागात नेहमी वन्यप्राण्यांचा वावर असतो. माहितीनुसार, गुरुवार ता. 28 मे रोजी सकाळच्या सुमारास मालगाडी जात असताना अचानक वाघ रेल्वे रुळांच्या मधोमध आल्याने ही दुर्घटना घडली. धडक इतकी जोरदार होती की वाघाचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे याच गोंदिया–बल्लारशा रेल्वे मार्गावर यापूर्वीही अनेक वन्यप्राण्यांचा, विशेषतः वाघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने हा मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मृत वाघाचा पंचनामा करण्यात आला आहे. वाघाचे वय, लिंग आणि इतर बाबींची तपासणी करण्यात येत असून पुढील कार्यवाही वनविभागाकडून केली जात आहे.या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून जंगल परिसरातील रेल्वे मार्गांवर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.





