मुंबई : पुढील २ दिवसांमध्ये केरळसह तमिळनाडूमध्ये मान्सून धडक मारण्याची शक्यता आहे. तर राज्यात पावसाला पोषक वातावरण असून आज ६ जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज आहे. तर पुढील ५ दिवस काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता वाढताना दिसत असून २ जून रोजी राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील ५ , उत्तर महाराष्ट्रातील ४, पश्चिम महाराष्ट्रातील २, मराठवाड्यातील ४ आणि विदर्भातील ८ जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद होऊ शकते. किनारपट्टी भागातील नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.





