गोरेगाव, ता. 2: तहसील कार्यालयाच्या मागे असलेल्या नवीन तलावाच्या पाण्यात दोन जनावराचे मुंडके व अवयव फेकुन सामाजिक असंतोष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात रविवारी रात्री पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तोशिख हफीजअली सैय्यद (वय २८), हनीफ रफीक शेख (वय ४५), शाहीद ईस्माईल शेख (वय २९) असे आरोपींचे नाव आहेत.
घोटी येथील नवीन तलावात दोन जनावरांचे मुंडके व अवयव पाण्यात फेकुन दिल्याचे प्रकार नागरिकांना शनिवारी आढळले. या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक सुजित घोलप व सहकारी, पशुधन विकास अधिकारी यांनी या घटनेचा पंचनामा
केला. दरम्यान मृत जनावराच्या एका मुंडक्याच्या कानाला टॅग लावले होते. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी तालुक्यातील गावागावात पोहचताच सकल हिंदु समाज, विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाने एकत्र येऊन सामाजिक द्वेष पसरविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून अजामीनपात्र गुन्हा नोंद करा असे निवेदन रविवार पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांना दिले. सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी तत्काळ आंबाटोली येथील तीन व्यक्तींना अटक करण्यात आले. त्यांची विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यानंतर रात्री तिघांवर अजामीनपात्र गुन्हाची नोंद करण्यात आली. या आरोपींना सोमवारी गोंदिया येथे न्यायालय हजर करण्यात आले आहे.





