चंद्रपूर : नवजात बालक विक्री प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रामनगर पोलिसांनी नवजात बालक विक्री प्रकरणात भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या दोघीही स्थानिक भाजप आमदाराच्या निकटवर्तीय कार्यकर्त्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ संबंधित महिलाच नव्हे, तर यामागे मोठे रॅकेट किंवा प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग आहे का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
तिवारी म्हणाले की, या प्रकरणाचा तपास केवळ नवजात बालक विक्रीपुरता मर्यादित न ठेवता त्यामागे मानवी तस्करी (Human Trafficking), अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, संघटित सेक्स रॅकेट किंवा नवजात बालक विक्रीचे मोठे नेटवर्क कार्यरत आहे का, याचाही सखोल तपास करण्यात यावा. “या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा किंवा इतर प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे. तपास केवळ अटक झालेल्या महिलांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण साखळी उघड केली पाहिजे. जर या प्रकरणामागे राजकीय संरक्षण असेल, तर तेही जनतेसमोर आले पाहिजे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावरील स्वतंत्र यंत्रणेमार्फत करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच बालक विक्रीसारख्या अमानुष गुन्ह्यात कोणालाही राजकीय संरक्षण मिळू नये, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.





