“आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करून विद्यार्थ्यांना दिली लोकशाही व निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती”
गोंदिया- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यालय तथा जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळा, बिरसोला येथे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी आणि जबाबदार नागरिक घडावेत या उद्देशाने ईव्हीएम (Electronic Voting Machine) द्वारे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पार पडली.
निवडणुकीपूर्वी विद्यार्थ्यांना निवडणूक म्हणजे काय, मतदान प्रक्रिया कशी राबविली जाते, ईव्हीएमद्वारे मतदान कसे करतात तसेच मतदानानंतर बोटाला शाई का लावली जाते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रचारासाठी वेळ देण्यात आला. त्यानंतर नियोजित दिवशी सकाळी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.
शाळा प्रमुख, परिपाठ नायक, सांस्कृतिक नायक, क्रीडा नायक, स्वच्छता नायक, सहल प्रमुख आणि आरोग्य नायक या पदांसाठी एकूण २६ विद्यार्थ्यांनी उमेदवारी दिली होती. मतदानानंतर खालील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली:
शाळा प्रमुख: तन्वी दंदरे, तणवीर जमरे,सांस्कृतिक नायक: प्राची नागफासे, पुलकित पाचे,परिपाठ नायक: आर्या बाहे,क्रीडा नायक: शिवम, हर्षिता पाचे,स्वच्छता नायक: श्रावणी,सहल प्रमुख: रचना बाहे,आरोग्य नायक: वेद नागफासे, पावनी मात्रे निवड झालेल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना त्यांच्या पदानुसार जबाबदाऱ्या व कर्तव्यांची माहिती देण्यात आली.
शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक चंदू दुर्गे यांनी Voting Machine App च्या साहाय्याने उमेदवारांचे फोटोसह ईव्हीएम तयार करून प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. बॅलेट युनिटची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तर मुख्याध्यापक श्री. एस. एस. बिसेन यांनी केंद्राध्यक्ष म्हणून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नेतृत्व केले.मतदान अधिकारी म्हणून एन. एम. खोब्रागडे,डी. सी. रहांगडाले,प्रदीपकुमार रंगारी, तरन्नूम शेख, रितू नागफासे आणि सिंधू नागफासे यांनी उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली. तसेच संध्या ताई, भागन ताई आणि बबली ताई यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी जल्लोष करत टाळ्यांच्या गजरात आनंद साजरा केला. निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मंत्र्यांचा मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच वर्षभर उत्कृष्ट कार्य करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.हा उपक्रम विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदान प्रक्रिया आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा प्रेरणादायी ठरला.





