खास प्रतिनिधी, नाशिक:प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या पंचवटी आणि नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि त्यातून नागरिकांना गमवावा लागणारा जीव, याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवर तीव्र ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. शहरातील खड्ड्यांनी आतापर्यंत तब्बल १२ जणांचा बळी घेतला असून ५५० हून अधिक नागरिक जखमी व अपंग झाले आहेत. आगामी १५ दिवसांत सर्व खड्डे बुजवून रस्ते पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा या वेळी पक्षाकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आला.
आगामी काळात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. त्यासाठी रस्त्यांच्या कामांवर तब्बल ३५ हजार रुपये खर्च दाखवण्यात आला असतानाही प्रत्यक्षात मात्र रस्तेच गायब झाल्याचे चित्र आहे. शहरात रस्त्यांच्या नावाखाली केवळ भ्रष्टाचार आणि लूट सुरू असल्याचा थेट आरोप मोर्चादरम्यान करण्यात आला.





