भंडारा, दि. १९ : नागरिकांना नलोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विविध शासकीय सेवा विहित कालमर्यादेत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांचे अर्ज व प्रकरणे प्रलंबित न ठेवता त्यावर तातडीने कार्यवाही करून ती निकाली काढावीत. लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त संदीप देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात राज्य सेवा हक्क आयुक्त संदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय विभागप्रमुखांची सार्वजनिक प्राधिकरणाच्या लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत कामगिरीच्या मूल्यांकनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त संदीप देशमुख यांनी लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विविध विभागांमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा, प्राप्त अर्जांची संख्या, निकाली काढलेली प्रकरणे, प्रलंबित अर्ज तसेच विभागनिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने प्राप्त अर्जांवर वेळेत कार्यवाही करून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही स्तरावर अर्ज अनावश्यकपणे प्रलंबित राहणार नाहीत, याची विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी. भंडारा जिल्ह्यात लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचे काम चांगले असून, ते अधिक प्रभावी करून नागरिकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य द्यावे, असेही आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला असून, नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामात हयगय किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.





