चंद्रपूर,दि.24 : ब्रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला ठार मारण्याच्या प्रस्तावावर नॅशनल टायगर कन्झर्वेशन अॅथॉरिटीने (एनटीसीए) मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत चर्चा झाली. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव यांना पाठविण्यात आला आहे.
या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालयात ठिय्या मांडला होता. वाघाला ठार मारण्याच्या आदेशाचे पत्र मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने वनविभागाची तारांबळ उडाली होती.अखेर आंदोलकांपुढे नमते घेत मुख्य वनसंरक्षक शेळके यांनी लगेच एनटीसीएची बैठक घेतली. त्यानंतर नरभक्षक वाघाला जिवंत पकडणे वा ठार मारण्याच्या निर्णयापर्यंत एनटीसीए पोहोचली आहे, असा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.





