मुंबई, दि. 6_ राज्याचे माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्या निधनाने सहकार आणि ग्रामविकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, श्री. धाबेकर यांचा ग्रामपंचात सदस्य ते राज्याचे जलसंधारण मंत्री असा प्रवास निश्चितच प्रशंसनीय आहे. ग्रामविकास, सहकार, जलसंधारण आदी क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अकोला जिल्हा परिषदेचे दीर्घ काळ नेतृत्व करताना त्यांनी या परिषदेला राज्यातील एक अग्रणी संस्था म्हणून ओळख प्राप्त करून दिली होती. कापूस उत्पादकांच्या उन्नतीसाठी कॉटन फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण होते. त्यांच्या निधनाने ग्रामविकासाची बांधिलकी जोपासणारा एक महत्त्वाचा नेता आपण गमावला आहे.





