मुंबई,दि.14(वृत्तसंस्था) – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले असून आज असंख्य शेतकर्यांच्या सह राजभवनावर मोर्चा आयोजीत करत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आ.बच्चू कडू यांनी केली. मात्र राजभवनावर पोहोचण्याआधीच नरिमन पॉईंट येथे हा मोर्चा पोलिसांनी अडवून आमदार बच्चू कडू यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. याआधी पोलिसांनी बच्चू कडू यांनी मोर्चा आयोजित करण्यासाठीची परवानगी नाकारली होती. यानंतरही बच्चू कडू यांनी आपण मोर्चा काढणारच असल्याचे सांगितले होते. दरम्यान, पुनर्वसन सचिवांची भेट घेऊन आंदोलन स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बच्चू कडूंना घेऊन जाणारी पोलीस व्हॅन आंदोलकांनी अडवली. यावेळी सौम्य लाठीचार्जही करण्यात आला.यासंबंधी बच्चू कडू यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. यानंतर नाराजी व्यक्त करत बच्चू कडू यांनी आपण पुढच्या वेळी आंदोलन करताना काहीही न सांगता थेट पोहोचू असा इशाराच दिला.





