
मुंबई,दि.15 – राज्यात सत्तास्थापनेचा घोळ सुटत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू होताच राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे.याचा परिणाम मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षावर दिसून आला आहे. मंत्रालयातील ७ व्या मजल्यावर सुरु असणारा हा कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गरजू लोकांना मदतीसाठी ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाल्याचे बघत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी गरीब रुग्णांना दिलासा देण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहीत कक्ष पुन्हा सुरु करण्याची विनंती केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. धनंजय मुंडे आपल्या पत्रात लिहिले आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्याने गरीब रुग्णांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. राष्ट्रपती राजवटीत शासनाचा कारभार सुरू ठेवण्याची जबाबदारी घटनेने आपल्यावर दिली आहे. आपल्या अनुमतीने हा कक्ष पुन्हा सुरू करून हजारो रुग्णांना दिलासा द्यावा. तसेच या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना राज्यपाल दिलासा देतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनेही याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रपती राजवटीच कारण दाखवून गरीब रुग्णांसाठी असलेला मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद आहे तो तात्काळ चालू करावा असे शिवसेना आमदार उदय सामंत यांनी केली आहे.





