भंडारा, दि. 15:- भात पिकाची लागवड, योग्य वाणाची निवड, रोग किडिचा बंदोबस्त तसेच योग्य वेळी योग्य प्रमाणात खताचे नियोजन करण्याचे आवाहन कृषी संशोधन केंद्र साकोलीचे वरिष्ट भात पैदासकार डॉ. जी. आर. श्यामकुंवर यांनी केले. तसेच बियाणांची निवड करतांना आवश्यक त्या सर्व चाचण्यांमधून पास होणारे महाबिज किंवा कृषी विद्यापिठाचेच बियाणे प्राधान्याने वापरण्याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
बियाणे व्यवसायात मोलाचे कार्य गेल्या चार दशकापासून करीत असलेल्या महाबिज या शेतकऱ्यांच्या व महाराष्ट्र शासनाच्या बियाणे कंपनीचे वतीने व कृषी विभाग तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ, कृषी संशोधन केंद्र साकोली यांचे सौजन्याने महाबिज उत्पादित नवीन भाताचे वाण सीओ-51 व पीडीकेव्ही-तिलक या वाणाचा पिक प्रात्यक्षिक पहेला येथे नुकतेच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना विज्ञानाची कास धरुन कृषी विभाग, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ व महाबिजचे तांत्रिक अधिकारी यांची वेळोवेळी मदत घेण्याचे व उत्पन्न वाढविण्याचे मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी भात शेतीसह भाजीपाला व फळपिकाचे नियोजन करुन शेतीतून उत्पन्न वाढविण्याचे आवाहन केले.
उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना महाबिजचे विभागीय व्यवस्थापक सुरेश गायकवाड म्हणाले, शेतीला विज्ञानाच्या जोडीने करण्याशिवाय पर्याय नाही. दिवसेंदिवस होत असलेल्या वातावरण व हवामानातील बदलावर मात करायची असल्यास विज्ञान व शास्त्रज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. पर्यायाने उत्पन्न वाढेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक यशवंत कामडी यांनी सीओ-51 व पीडीकेव्ही-तिलक या नवीन भाताचे वाणाचे गुणधर्म उपस्थितांना सांगितले.तसेच शेतीतून उत्पन्न वाढविण्याकरीता भात पिकासोबतच केळी व पपई सारखे फळ पिके घेतल्यास शेतीतून उत्पन्न् वाढविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाबिजकडे केळीची जी-9 या वाणाची उती संवर्धित एक सारख्या वयाची आणि सारख्या आकाराची विषाणू रहित रोगमुक्त रोपे प्रती रोप 13.50 रुपये प्रमाणे उपलब्ध आहेत. संकरीत पपई या वाणे तैवाण-रेड लेडी-786 या वाणाचे अनुवांशिक शुध्दता असलेले रोपे रुपये 13 प्रती रोप प्रमाणे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचलन महाबिजचे सहाय्यक क्षेत्र अधिकारी आनंद चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार मंडळ कृषी अधिकारी पाल यांनी मानले. या कार्यक्रमास पहेला व जवळपासच्या गावातील 150 शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घेतला.




