अर्जुनी मोर,दि.16ः-भगवान बिरसा मुंडा हे केवळ २५ वर्ष जगले. मात्र, या कालावधीत त्यांनी अन्याय, अत्याचारात खितपत पडलेल्या आदिवासी समाजाला योग्य दिशा दाखविण्यासाठी अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी उभे केले. २५ वषार्ंच्या अल्पवयात भगवान बिरसा मुंडानी क्रांतीचे बिजे रोवली. त्यामुळे भगवान बिरसा मुंडाचे विचार सर्वच मागासवर्गीय समाजासाठी प्रेरणादायीच आहेत. असे विचार अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापूरे यांनी व्यक्त केले.
ते तालुक्यातील पवनी / धाबे येथे १५ नोव्हेंबर रोजी आयोजित जननायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त उदघाटक स्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.व्य.सं. रामनगरचे राजहंस ढोके होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य किशोर तरोणे , रतिराम राणे, शिशुकला हलमारे, दुर्गाप्रसाद कोकोडे, अनिल दहिवले, मदन कौरथी, वाळवे सर, कंसराम धिकुवर, मुनेश चौधरी, सुजता गुडघेवार, प्रेमलाल गेडाम, पुरूषोत्तम मसराम, कलिराम काटंगे, भीमराव नंदेश्वर व अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम आ. मनोहरराव चंद्रिकापूरे यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांचे पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण व पूजाअर्चना करून जयंती सोहळ्याला सुरवात करण्यात आली. तत्पूर्वी आदिवासी समाज संघटनेच्या वतीने गावातील प्रमुख मार्गाने भगवान बिरसा मुंडाचे जयघोष करीत व पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून विशाल रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाला आदिवासी व ग्रामवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





