गडचिरोली,दि.20ः- क्रीडा संमेलनामुळे माझ्या शालेय बालपणाची मला आठवण झाली. खेळामध्ये हार-जीत असतेच, परंतु हरल्यामुळे निराश न होता खेळाडूवृत्तीने खेळावे. मनामध्ये कुठलीही कटुता न ठेवता मैत्री व स्नेहाचे वातावरण या क्रीडासंमेलनाच्या निमित्ताने एकमेकांत निर्माण करावे. जीवन अतिमहत्वाचे आहे. त्यामुळे कुठल्याही वाईट मार्गाकडे वळू नये. आदिवासी विभाग व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय असल्यामुळे चांगल्या गोष्टींचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा. मेहनत घेऊन गडचिरोली जिल्हा, राज्य व देशाचे नावलौकिक करावे, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आर्शम शाळेच्या क्रीडांगणावर १९ नोव्हेंबर रोजी तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद््घाटन पार पडले. या प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, रांगीचे सरपंच जगदीश कन्नाके, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काटेंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक किरंगे, उपसरपंच नरेंद्र भुरसे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, वंदना महल्ले, सुधाकर गौरकर, रांगीचे प्रभारी मुख्याध्यापक अनिल रामटेके उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. जाखड म्हणाल्या, क्रीडा संमेलन हे व्यसनमुक्त म्हणून यशस्वी करून दाखवावे. आदिवासी खेळाडूंने खर्रा, तंबाखू, दारू आदी व्यसन करू नये. प्रत्येकांनी जीवनात व्यसनमुक्तीचा संकल्प घ्यावा. व्यसनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कर्करोगासारखे जीवघेणे आजार होतात. मी डॉक्टर असल्याने खात्रीने सांगते की, निर्व्यसनी राहिल्याने जीवनात खूप फायदे आहेत व खरा आनंद मिळतो. खेळातून उत्सुकता व संयम शिकायला मिळते. याचे संतुलन जो करायचे शिकतो तो जिवनात यशस्वी होतो, असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले. संचालन अनिल बारसागडे तर आभार धनंजय वाणी यांनी केले. यशस्वितेसाठी क्रीडा समन्वयक संदिप दोनाडकर, सुधीर शेंडे, ए. ए. रामटेके, प्रेमिला दहागावकर, पी. व्ही. भोयर, यु. वाय. बिसेन, टी. एम. सोनकुसरे, बी. आर. इरखेडे, पी. के. आत्राम, अनिल कुरुडकर, व्यंकटेश चाचरकर, मंगेश ब्राम्हणकर, सुभाष लांडे, अश्विन सारवे, विनोद चलाख, संतोष गैनवार, विनायक क्षीरसागर, अजय वाकडे, सुधीर झंझाड, आशिष नंदनवार, आनंद बहिरवार, रामचंद्र टेकाम आदींनी सहकार्य केले.




