वाशिम, दि. ११ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालयात ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. गो. बिलोलीकर होते. यावेळी २४० प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, न्यायिक अधिकारी एस. एम. मेनजोगे, एस. पी. शिंदे, पी. एच. नेरकर, श्रीमती एस. व्ही. फुलबांधे, श्रीमती डॉ. यु. टी. मुसळे, जी. बी. जाणकार, एम. एस. पौळ, एस. पी. बुंदे, जिल्हा विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष अॅड. बबनराव इंगोले आदी उपस्थित होते.राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे आपसात तडजोडीने निकाली काढून आपसी संबंध टिकवून ठेवण्याचे आवाहन यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बिलोलीकर यांनी केले.
जिल्ह्यातील दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबित अशी एकूण ४७१४ प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी स्वरुपाची प्रकरणे, हिंदू विवाह कायद्याअंतर्गत प्रकरणे, धनादेशाची प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व प्रकरणे व न्यायालयातील प्रलंबित अशी एकूण २४० प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच यावेळी १ कोटी २३ लक्ष ६० हजार ८४७ रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी न्यायिक अधिकारी, वकील संघ, सामाजिक कार्यकर्ते व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. देशपांडे यांनी मानले.




