
नागपूर दि.३१: – लेखी आश्वासन नसले तरी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आम्ही सोडलेला नाही. वेगळ्या विदर्भाची आमची भूमिका कायम आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे शनिवारी स्पष्ट केले. समाधान शिबिरानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आपण लेखी आश्वासन दिले. मग तरीही विदर्भाचे वेगळे राज्य का देत नाही, असा प्रश्न भाजपाध्यक्ष अमित शहा यांना विचारण्यात आला. त्या वेळी बोलताना शहा यांनी लेखी आश्वासन नसले तरी विदर्भाच्या मुद्द्यावर आम्ही कायम आहोत, असे सांगितले. मात्र, त्यांचे वक्तव्य नीट प्रसिद्ध झाले नाही, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
विधानसभा निवडणुकीत युती तुटली नसती तर आम्हाला आमची ताकद खरेच कळली नसती. पण, हा विषय तेथेच संपला. मुंबई महापालिकेसह इतरही निवडणुका आम्ही भविष्यात एकत्रच लढू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पोलिसांसह इतर शासकीय कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा पगार नेपाळ भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी कापण्यात आला, या बातमीत तथ्य नाही. असा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. काही संघटनांनी स्वत:हून तयारी दर्शवल्याने त्या संघटनांच्या कर्मचाऱ्यांचे पैसे कापण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक अर्ध्या तासात होते. त्यात त्वरित निर्णय होतात. त्या धर्तीवर राज्यात बैठक घ्यावी, असे कोणतेही निर्देश पीएमनी दिले नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.





