25.9 C
Gondiā
Thursday, July 9, 2026
Home विदर्भ ग्रामीण भागातील जलद सर्वेक्षण  पथकाने प्राधान्याने घरोघरी  भेट दयावी – जिल्हाधिकारी

ग्रामीण भागातील जलद सर्वेक्षण  पथकाने प्राधान्याने घरोघरी  भेट दयावी – जिल्हाधिकारी

Ø  अनाथांसाठी वसतिगृहात निवास व भोजन Ø  बिडीओ व तहसिलदांरानी समन्वय ठेवावा Ø  सोशल डिस्टन्सिंग पालन करा

0
200

भंडारा,दि. 27 :- कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करत असून ग्रामीण भागातील जलद सर्वेक्षण पथकाने प्राधान्याने दररोज 10 गृहभेटी देवून त्याचा अहवाल खंडविकास अधिकारी यांना दयावा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हयातील सर्व सीमा बंद केल्या असून परदेशातून तसेच राज्यातील व राज्याबाहेरुन आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता जिल्हयातील सर्व नागरिकांनी घराबाहेर न पडता सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी  जिल्हयातील  पोलीस अधिकारी, तहसिलदार,  खंडविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची  बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित  करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ,  अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अनिकेत भारती , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मोटघरे यावेळी उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात जलद सर्वेक्षण पथकाची अंमलबजावणी योग्य रितीने करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व आशा वर्कर यांचे नावासहीत आदेश उपविभागीय अधिकारी यांनी त्वरित निर्गमित करावे. जलद सर्वेक्षण पथकाने दररोज 10 गृहभेटी देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. नागरिकांना अत्यावश्यक गरजा पूर्ण करणे तसेच नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी आवश्यक कामासाठी घराबाहेर जाण्यास परवानगी देण्यासाठी भंडारा शहरात चार झोन तयार करावे. अत्यावश्यक असल्यास परवानगी दयावी. तसेच ग्रामीण भागात नागरिकांना परवानगी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी नायब तहसिलदारांना  नियुक्त करावे. तर शहरी भागात नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी हे त्यांनी नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करतील. भाजीपाला विक्रेत्यांना परवानगी देण्यात यावी. मोटार बाईकवर फकत एकच व्यक्तींना परवानगी देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

भाजीपाला विकण्यासाठी  आलेल्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगावे. जिल्हयात संचारबंदीला चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. टप्प्या टप्प्यात सर्व शहरात किटकनाशक फवारणी  करावी. रुग्णालय परिसर पहिल्या टप्यात घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शासकीय वसतिगृहात भिकारी व अनाथांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांची समिती नेमण्यात आली आहे. ज्याचे जवळ काहीच नाही त्यांना भोजन व इतरांना राशन देण्यात येईल.

ग्रामीण भागात तहसिलदार व खंडविकास अधिकारी यांनी समन्वयातून काम करून आरोग्य अधिकारी यांना सहकार्य करावे. ग्रामीण भागातील होम क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींना दररोज भेट देवून तसा अहवाल सादर करावा.  त्यांना घराबाहेर पडू नये असा सल्ला दयावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

देखरेखीखालील व्यक्तीने,  त्यांची सुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीने, निकट सहवासितांनी घरातील सुश्रूषे दरम्यान वापरलेले मास्क 5 टक्के ब्लिच सोल्युशेन किंवा 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जंतुक करुन त्याची जाळून विल्हेवाट लावावी. वापरलेला मास्क हा जंतुसंसर्ग युक्त आहे असे समजावे त्याचा पुनर्वापर करू नये. खोकला, ताप, श्र्वसनाचा त्रास, धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी 07184-252247, 07184-252317, जिल्हा नियंत्रण कक्ष 07184-251222 किंवा पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.