पाटणा(विशेष प्रतिनिधी),दि.30ःः सध्या लग्न सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत असून याच दरम्यान लग्न समारंभाला हजेरी लावणे काहीना चांगलेच महागात पडले आहे.त्यातच कोरोनामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बिहारच्या पाटण्यात समोर आली आहे. तसेच लग्न समारंभाला हजेरी लावलेले तब्बल 95 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. 15 जून रोजी पालिगंजमध्ये एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्न सोहळ्याला उपस्थित असलेली 95 वराती मंडळी कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. गुरूग्राममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाचा विवाह होता. तो लग्नासाठी आपल्या गावी आला. त्यावेळीच त्याची तब्येत ठिक नव्हती. मात्र उपचार घेण्याऐवजी धुमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला. लग्नसमारंभात सहभागी झालेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुरुवातीला 15 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर इतर 80 जणांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.





