हल्ला प्रकरणात सात आरोपी अटकेत

0
699

तिरोडा : गस्तीवर असलेल्या नायब तहसीलदारांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना मध्यप्रदेश राज्यातून अटक केली आहे. तिरोडा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार आप्पासाहेब वानखेडे हे गुरुवार १२ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या सहकार्‍यांसह तालुक्यातील अर्जुनी वन विभागाच्या नाक्यावर वैनगंगा नदी काठावर वाहन घेऊन गस्त घालीत उभे असताना काही इसमांनी त्यांच्याशी वाद घालून त्यांन मारहाण केली. तसेच त्यांच्या वाहनांचेही नुकसान केले. त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. रात्रीच्या अंधारात आरोपींना ओळखणेही कठीण झाले. याप्रकरणी पोलिसात वानखेडे यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान रेती, विटा व्यवसाय करणार्‍यांची विचारपूस केली. यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारावर दवनीवाडा पोलिसांनी याप्रकरणात सात आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चंद्रशेखर भैयालाल रायकर, जितेंद्र गजानन दमाहे दोन्ही रा. खैरलांजी जि. बालाघाट (मध्यप्रदेश), अजय रमेशप्रसाद दमाहे, आयुष सहदेव बसेना, अनिलकुमार राजेंद्रप्रसाद द्विवेदी रा. नैनी जि. (इलाहाबाद), प्रवीण हिरालाल तुरकर रा. खैरी, स्नेहील दादूराम रा. माहुरा (उत्तर प्रदेश) यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.