अर्जुनी/मोरगाव :- विद्युत गळतीमुळे शालेय इमारतीत विद्युत प्रवाह सुरू झाल्याने परिणामी शालेय विद्यार्थ्यांना भिंती द्वारे विजेचा शॉक बसल्याची घटना तालुक्यातील निलज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
भंडारा जिल्ह्यातील पुयार येथे विद्युत शॉक लागून काही दिवसांपूर्वीच एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या प्रकारातून अद्यापही शिक्षण विभागाने बोध घेतल्याचे दिसून येत नाही. २५ जुलै गुरुवार रोजी नित्यप्रमाणे शाळा भरली. वर्ग सुरू होण्याआधी विद्यार्थी पटांगणा खेळत होते. काही विद्यार्थी शाळेच्या गॅलरीमध्ये भिंतीला स्पर्श करून होते. विद्यार्थ्यांना अचानक कसला तरी भास झाला.हा प्रकार मुख्याध्यापिका जांभुळकर यांना विद्यार्थ्यांनी सांगितला असता त्या भिंतीला विद्युत प्रवाह असल्याचे समजले. लाईनमण द्वारा शाळेचा विद्युत प्रवाह बंद करण्यात आला.शाळेत एक ते चार वर्गात शिक्षण घेणारे 42 विद्यार्थी असून शाळा दोन शिक्षकी आहे. शाळेची इमारत अत्यंत जुनी असल्याने जीर्ण अवस्थेत आहे. इमारतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत.छत गळतीमुळे वर्गामध्ये ओलावा राहतो.
छत गळतीमुळे विद्यार्थ्यांना त्रास
या ओलाव्यावरच विद्यार्थी अध्ययन करतात. छत गळतीमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषदेने नुकतेच सर्वसाधारण सभेमध्ये निवडक शाळांना मॉडेल बनवण्यासाठी ठराव पारित केले आहे. मात्र केवळ एक शाळा मॉडेल बनवून होणार नाही. जिल्ह्यातील सर्व जीर्ण इमारतींचे ऑडिट करून नव्याने इमारती तयार कराव्यात जेणेकरून गरिबांचा आधार असलेली जिल्हा परिषद शाळा उत्तम प्रकारे शिक्षण देण्यास समर्थ ठरेल अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.
- वाटरफिल्टर नादुरुस्त
- विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून पंचायत समितीने लावलेले वॉटर फिल्टर देखभाल दुरुस्ती अभावी बंद आहे.ज्या ठिकाणी विद्युत मीटर बसविलेले आहे त्या संपूर्ण भिंतीला ओलावा आहे.त्यामुळेच ही विद्युत गळती होत असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
- छतदुरुस्तीत भ्रष्टाचार?
- दोन वर्षाआधी जिल्हा परिषदेने तीन लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून छतगळती थांबविण्यासाठी उपाययोजना केली होती.मात्र सदर कंत्राटदाराने अधिक नफेखोरीच्या नादात निधीची वासलात लावल्याचे आरोप गावातील नागरिकांनी केली आहे.
- इमारत मंजूर असल्याची माहिती – उपसरपंच
- जिल्हा परिषदेने या ठिकाणी नवीन इमारत मंजूर केली आहे. त्याचे वर्क ऑर्डर झाले आहेत.मात्र कंत्राटदारांच्या आपसी हेवेदाव्यामुळे सदर बांधकाम अद्यापही सुरू झाले नाही अशी माहिती उपसरपंच नंदकिशोर गहाणे व गावातील नागरिकांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.





