
मुंबई:-राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेल्या 11 वी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे 11 वी प्रवेशाची पहिली यादी 30 जूनला जाहीर होणार होती, पण पहिली गुणवत्ता यादी आजच शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. जवळपास मागील दीड महिन्यापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत होते. राज्यातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी यंदा अकरावीत कॉलेजसाठी ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. दरम्यान, विद्यार्थी व पालकांना https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पाहता येणार आहे.
सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार 30 जून ते 7 जुलै दरम्यानच्या कालावधीत पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करुन पारदर्शक व निकोप पध्दतीने प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आजच यादी जाहीर झाली असून 1 ते 7 जुलै दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा वेळ दिला आहे. दहावी बोर्ड परीक्षा निकाल जाहीर होऊन दीड महिना झाला अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत 12 लाख 71 हजार विद्यार्थी आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर जाऊन आपली गुणवत्ता यादी पाहून प्रवेशाचा निर्णय घ्यावा.
राज्यात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. २१ मेपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीपासून शिक्षण विभागाच्या गलथान कारभामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी, पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. प्रवेश प्रक्रियेत २६ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात तसे झाले नाही. आणि दोन दिवसांपूर्वी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार ३० जून रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. परंतु, शनिवार २८ जून रोजी पुन्हा यात बदल करत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले.