नागपूर-राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना (School) १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार लागणार्या निधीची तरतूद न केल्याने राज्यातील सर्व शाळा येत्या ८ व ९ जुलै रोजी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती म.रा. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे नागपूर विभाग सचिव अजय भोयर यांनी दिली.
राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाच्या वाढीव टप्पा मिळावा या मागणी करता ऑगस्ट २०२४ पासून कोल्हापूर येथे ७५ दिवस तसेच राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू होती. याची परिणीती म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) १०ऑक्टोबर २०२४ च्या मंत्रिमंडळ निर्णयात या सर्व शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे शासनाने कबूल केले. तसा शासन निर्णय देखील १४ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आला. मात्र यानंतर दोन अधिवेशने झाली आणि सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन हे तिसरे अधिवेशन आहे. परंतु या शाळांना लागणार्या निधीची तरतूद विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत करण्यात आलेली नाही. यामुळे राज्यातील ६० हजारपेक्षा जास्त विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांच्या मध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा म्हणून ५ जून २०२५ पासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन
शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा म्हणून ५ जून २०२५ पासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. या प्रश्नासंदर्भात वेळोवेळी संबंधित मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी तुमचे काम आम्ही करणार आहोत, होणार आहे असा शब्द दिला गेला. परंतु प्रत्यक्षात तोंडाला पाने पुसली असल्याचे अजय भोयर यांनी सांगितले. गेल्या पंचवीस वर्षापासून विनावेतन पवित्र असे ज्ञानदानाचे काम करणार्या विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांना शासन झुलवत ठेवून त्यांचा अंत पाहत आहे. याचा निषेध म्हणून ८ व ९ जुलै रोजी संपूर्ण राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद आंदोलन करून हजारो शिक्षक आझाद मैदान गाठणार आहेत. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ (Maharashtra State Principals’ Corporation), महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ आणि राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
शाळा बंद आंदोलनाबाबतचे निवेदन शिक्षणाधिकारी जयश्री धारफळकर यांना देण्यात आले. यावेळी म.रा. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अमित प्रसाद, मनिष मारोडकर,सरोज अग्निहोत्री, किशोर चौधरी, प्रकाश खाडे, विनोद जक्कनवार, रणजित गावंडे, शैलेंद्र भोसले, प्रणोज बनकर, सिद्धार्थ वाणी, गजानन मलकापुरे, संतोष जगताप, महेन्द्र कांबळे, प्रफुल्ल लांबट, विठ्ठल दौलतकर, अजय डांगे, विशाखा पुरी, विद्या चांभारे, सुनिता शामकुवर, कांचन भुतडा, रजनी चौधरी, सुचिता इंदुरकर, नरेश कुटेमाटे उपस्थित होते.