ग्रामीण उद्योजकांच्या वस्तूंची विक्री मंत्रालयाच्या प्रांगणात

0
6

मुंबई, दि. 18 : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून खादी व ग्रामोद्योग वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील दालनांना उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी भेट दिली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने दि. 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील अमरावती, जळगाव, सांगली, सातारा, वर्धा, रायगड, पालघर, या शिवाय इतर जिल्ह्यातील ग्रामीण उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. महाबळेश्वर येथील मध व वर्धा येथील सेवाग्रामची खादी तसेच लाकडी वस्तू, मसाले, देशी गाईचे तूप, तांब्यावरील नक्षीकाम केलेली भांडी, दिवाळीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, साबण व इतर गृहोपयोगी वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, यांच्या मार्गदर्शनात तर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांच्या नेतृत्वात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.