सार्वजनिक जीवनातून भय्यू महाराज निवृत्त

0
10
कोल्हापूर – बड्या राजकीय नेत्यांसमवेत वावरणारे अाध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने त्यांना डी. लिट. ही पदवी प्रदान केल्यानंतर भाषणामध्ये भय्यू महाराजांनी ही घोषणा केली. निवृत्तीनंतर इंदूरला चिंतन, मनन आणि शेती करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.भय्यू महाराज म्हणाले, शेती विकून जमेल तेवढं काम करण्याचा मी प्रयत्न केला. साथही मिळाली. आता परिस्थिती बदलत आहे. माझी क्षमता संपत आहे. सहनशक्तीच्या पलीकडे घडत असल्यामुळे निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार बैठकीत त्यांनी भूमिकेचा पुनरुच्चार करत खंतही व्यक्त केली. सर्वसामान्यांच्या भल्यासाठी सर्वोदय परिवाराच्या माध्यमातून १५० प्रकल्प उभे केले. प्रसंगी त्यासाठी शेतीही विकली. मात्र या कामासाठी समाजाने ज्या पद्धतीने पाठिंबा देणे आवश्यक आहे तो मिळत नसल्याची खंतही त्यांनी मांडली.
भय्यू महाराज म्हणाले, हल्ली सोंगाढोंगाचे महत्त्व वाढत आहे. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी मिळतात, दुष्काळग्रस्तांना निधी मिळत नाही. हैदराबादच्या रोहितचा मृत्यू गाजतो, पण उस्मानाबादच्या कांबळे दांपत्याने आत्महत्या केली, त्यांची पोरं उघड्यावर पडली त्याचं कुणाला काहीच नाही, अशी व्यथा त्यांनी बोलून दाखवली.