मुंबई, दि. 21 : बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातून दोन वर्षात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींसह २०० युवकांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.ते पुढे म्हणाले, बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी करण्याकरिता तसेच शास्त्रोक्त पद्धतीने बांबू लागवड व औद्योगिक वापरासाठी त्याचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे २०१४ साली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 5 जुलै 2015 रोजी या केंद्राचे उदघाटन झाले आणि बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंचे प्रशिक्षण येथे दिले जाऊ लागले. या केंद्रात बांबू टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून केंद्राची वाटचाल सुरळीत सुरु झाली आहे.
दोन वर्षांच्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची प्रक्रिया संपली आहे आणि कोर्स लवकरच सुरू होईल. बांबूच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र स्टेट टेक्निकल एज्युकेशनची यास संलग्नता मिळाली आहे. एकावेळी 20 उमेदवारांना या कोर्ससाठी प्रवेश देण्यात येत असून अभ्यासक्रम सुरु असतांना विद्यार्थ्यांना आगरतळा आणि व बंगळुरू येथील नामांकित संस्थेत प्रात्यक्षिकासाठी पाठविले जाईल.
केंद्रातील विद्यार्थ्यांनी बांबूपासून गणपती मूर्ती, मोटर सायकलचे चाक तयार केले आहे. याशिवाय फर्निचर, पेपर वेट, फ्रेम्स, मॅट्स,वॉल घडी, स्मृतीचिन्ह, पिशव्या देखील तयार केल्या आहेत. बीआरटीसी या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून कारागिरांचे जीवनमान उंचावेल. केंद्राच्या तंत्रशाळेत सध्या ३५ कामगार काम करीत असून ही संख्या वाढविण्याचा केंद्राचा मानस आहे.बांबू प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र मोठ्या प्रमाणावर बांबूच्या क्षेत्रात वृक्षारोपण आणि उत्पादनांच्या मूल्यवर्धिततेवर संशोधन आणि प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करत आहे. शिवाय केंद्राची स्वत:ची रोपवाटिका देखील विकसित करण्यात येत आहे. अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना बांबू वृक्षारोपण, व्यवस्थापन, कापणीचे ज्ञान मिळेल आणि ते हस्तकला, इमारत, पूल, यासारख्या विविध व्यापारिक वापरासाठी योग्य बांबू निवडण्यास सक्षम होऊन बांबूवर आधारित उद्योग करू शकतील, असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.