ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृषिउद्योगांची महत्त्वाची भूमिका – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
10

पुणे दि.१५- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविल्याशिवाय त्यांना शहराकडे जाण्यापासून रोखता येणार नाही. त्यादृष्टीने प्रयत्न करताना ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृषिउद्योगांची महत्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

वैकुंठ मेहता  राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, पुणे येथे आयोजित कृषिउद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ‘सूत्र २०२२’ परिषदेत ते बोलत होते. कार्यक्रमाला वैकुंठ मेहता  राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थाचे संचालक पार्थ राय, संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष  संतोष रामगिरे, डॉ.हेमा यादव, डॉ.डी. रवी, अनिल तिवारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, पारंपरिक शेतीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविता येणार नाही. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याला शासन प्रोत्साहन देत आहे. कृषिउद्योग ग्रामीण विकासासाठी महत्वाचे असल्याने त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून शेतमालाला बाजार मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

सहकार क्षेत्राला अधिक मजबूत करण्यासाठी सहकारी संस्थांना बळकट करावे लागेल. वैकुंठ मेहता  राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थानी या क्षेत्रात चांगले काम करणारे विद्यार्थी घडवले. सहकार विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमच्या फार कमी संस्था देशात आहेत. या क्षेत्रातील विविध शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व करण्याची क्षमता या संस्थेत आहे असे त्यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग क्षेत्रात अनेक सुधारणा करण्यात येत असून राज्याला वस्त्रोद्योग क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी उद्योजकांच्या सूचनेनुसार लवकरच मुंबईत खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न आहेत, असेही श्री. पाटील म्हणाले.

कार्यक्रमात उपस्थितीत अन्य मान्यवरांनीही यावेळी विचार व्यक्त केले.