सक्षम लोकशाहीसाठी माध्यमांबरोबरच लोकांचे सहकार्य महत्त्वाचे- संपादक संदीप भारंबे

0
6

नागपूर, दि. 26 : सक्षम लोकशाहीसाठी माध्यमांबरोबरच लोकांचे सहकार्यही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन दै. सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात दै.सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

यावेळी श्री.भारंबे म्हणाले, “विधिमंडळाचे कामकाज जनतेपर्यंत पोहचविण्याचे प्रसारमाध्यम हे एक माध्यम आहे. सध्या प्रसारमाध्यमांची संख्या वाढते आहे. विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन करताना ते योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळावर सामान्य जनतेच्या दृष्टीने अंकुश ठेवण्याचे काम प्रसारमाध्यम करीत असतात. समाजाचे प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात त्यांचे सदस्य येत असतात. विधिमंडळाचे कामकाज व परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहचविण्याची महत्त्वाची भूमिका प्रसारमाध्यमे पार पाडत असतात.

विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन करताना विधिमंडळाचा व विधिमंडळ सदस्यांच्या विशेषाधिकारांचा भंग होऊ नये याची काळजी वार्तांकन करणाऱ्या प्रतिनिधींना घ्यावी लागते. जनतेचे हिताचे प्रश्न जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न माध्यम प्रतिनिधी करीत असतात. जबाबदारी ओळखून ते काम करीत असतात. प्रिंट मीडियाबरोबरच समाजमाध्यमे वाढत असताना सर्व माध्यमांनी विश्वासार्हता राखणे गरजेचे आहे. नागरिकांनीदेखील जबाबदारी ओळखून एखाद्या जनहिताच्या निर्णयाची बातमी आल्यानंतर लोकचळवळ उभी करणे आवश्यक असल्याचेही श्री. भारंबे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री. भारंबे यांचा परिचय करुन दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. भारंबे  यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.

सत्तारुढ आणि विरोधी पक्ष सदस्यांकडून सहकार्याने व समन्वयाने जनसामान्यांच्या हिताचे निर्णय – आमदार रोहित पवार

नागपूर, दि. 26 : “संसदीय लोकशाहीमध्ये सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे सदस्य सहकार्याने व समन्वयाने जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात. हे संसदीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे”, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात आमदार रोहित पवार यांनी ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’  या विषयावर मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, अमोल मिटकरी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, “समाजकारण व राजकारणात युवकांना संधी ही अचानक येऊ शकते. या संधीमध्ये युवकांनी जबाबदारीने व योग्य तो निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. संसदीय अभ्यासवर्गात मलाही आज  अचानक संधी मिळाली. तुम्हालाही राज्यातील निवडक विद्यार्थ्यांमधून संसदीय अभ्यासवर्गाच्या माध्यमातून विधानपरिषदेच्या सभागृहात बसण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात योग्य ती सामाजिक भूमिका घेणे, ही तुमची जबाबदारी आहे. आपण चांगले नागरिक होणे महत्त्वाचे आहे. मतदान प्रक्रियेत लोकशाहीसाठी सर्वांनी सहभागी होणे महत्त्वाचे आहे”.

“सभागृहामध्ये सत्तारुढ व विरोधी सदस्य हे आपआपल्या परीने जनसामान्यांचे प्रश्न मांडत असतात. हे प्रश्न सोडविण्याच्या मुद्यांवरुन काही वेळेस सत्तारुढ व विरोधी पक्षांत मतभेद निर्माण होतात. अशा वेळी दोन्ही पक्षांनी जनतेच्या हिताच्या दृष्टीने सहकार्य व सामंजस्याची भूमिका घेणे महत्त्वाचे असते. राज्याच्या विधिमंडळाने यापूर्वी सत्तारुढ व विरोधी पक्षांच्या सहमतीने व सहकार्याने अनेक महत्त्वाचे कायदे केलेले आहेत. ते पुढे देशपातळीवरही घेण्यात आलेले आहेत. संसदीय लोकशाहीसाठी  सत्तारुढ व विरोधी पक्षांत संतुलन असणे आवश्यक आहे. सत्तारुढ पक्षाने राज्याच्या हिताच्या दृष्टीने विरोधी पक्षाच्या सूचनांचा व मुद्यांचा आदर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांनीही जनहिताच्या निर्णयांना सहकार्य करणे आवश्यक आहे. यातूनच संसदीय लोकशाही सक्षम होण्यास मदत होणार आहे”  असे श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री. पवार यांचा परिचय करुन दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. पवार यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.चिन्मयी तळेकर यांनी आभार व्यक्त केले.

००००