महात्मा गांधी आणि विनोबांना नमन करून निघाली ग्रंथ दिंडी

0
3

– ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरवात

वर्धा : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा नगरित शुक्रवारी ३ फेब्रुवारीला ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास परंपरागत ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या वतीने आयोजित या संमेलनाच्या अनुषंगाने वर्धा नगरीतील नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि दिंडीचे विधिवत पूजन झाले. त्यानंतर वाजत गाजत, विठ्ठलाच्या गजरात
ग्रंथ दिंडी संमेलन स्थळ असलेल्या महात्मा गांधी साहित्य नगरी, स्वावलंबी विद्यालयाकडे रवाना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोस्ट ऑफिस चौक, सेंट अँटॉनी नॅशनल स्कूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही ग्रंथ दिंडी निघाली.
ग्रंथ दिंडीमध्ये विठ्ठल-रुखमाई, संत समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, चक्रधर स्वामी, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, संत जनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ, झांशी ची राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलताना, मदर टेरेसा आदी महापुरुषांच्या वेशभूषेत विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मोझरीच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात ‘जय हरी विठठल’ असा गजर केला. ग्रंथ दिंडीचे स्वागत ठिकठिकाणी पुष्पावर्षाव करून होत होता. संमेलन स्थळावर पोहोचताच साहित्याचा जयघोष झाला.

सूत कातून ग्रंथ दिंडी
– विशेष म्हणजे, चारख्यावर सूत कातून ग्रंथ दिंडी तयार करण्यात आली. वर्धा जिल्ह्याची परंपरा यातून व्यक्य करण्यात आली. दिंडीत लिळाचरित्र, श्रीज्ञानेश्वरी, भारताचे संविधान आदी ग्रंथांचा समावेश होता.

मराठीची पताका सर्वसमावेशक
– सेंट अँटनी नॅशनल स्कुलचे मुख्याध्यापक फादर सुबिन, व्यवस्थापक फादर विनसंट, उपमुख्याध्यापक सिस्टर जिस रॉस यांनी ग्रंथ दिंडी शाळेसमोर पोहोचताच सूत हार घालून आणि मराठी परंपरेप्रमाणे दिवा ओवाळून आणि तिळा लावून स्वागत केले. दिंडीमध्ये जात, धर्म, विचार भेद दूर सारून सारेच सहभागी झाले आणि मराठीची ध्वज पताका आमच्या हाती सर्वसमावेशक असल्याची भावना दृढ केली.