सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी एकत्र येऊन देशाला जागतिक शक्ती बनवण्याचा अजित पवार यांचा संकल्प

0
1

कोल्हापूर-देशाच्या स्वातंत्र्योत्तर 76 वर्षांच्या वाटचालीत देशाचा गौरव वाढवण्यात शेतकरी, कष्टकरी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, व्यापारी, उद्योजक, संशोधक, खेळाडू, कलावंत मंडळी, विद्यार्थी, शिक्षक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते अशा सर्वांचं योगदान आहे. या समस्त देशवासियांची एकजूट, कष्टामुळं, मेहनतीमुळं देश आज अभिमानानं उभा आहे. प्रगती करत आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवून सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी एकत्र येऊन देशाला जागतिक शक्ती बनवण्याचा दृढ निर्धार करुया, असा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाची लोकशाही मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्ताने ध्वजारोहण केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर आणि छत्रपती शाहू महाराज, तसेच राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या त्याग, बलिदानातून मिळाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखण्यासाठी गेल्या 76 वर्षांत भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी बलिदान दिले. या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करुन देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी कटीबद्ध होण्याचा आज दिवस असल्याचे अजित पवार म्हणाले.