उष्णतेच्या लाटेचा इशारा,राज्यात वर्धा 45अंश सेल्सिअस तापमान

0
9

पुणे ,दि.15: विदर्भातील तुरळक ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये उष्णतेची लाट येणार असून, येत्या रविवारपर्यंत (ता. 16) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही उष्णतेची लाट पसरेल, असा इशारा हवामान खात्याने शुक्रवारी दिला. पुण्यात या उन्हाळ्यातील उच्चांकी म्हणजे 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक तापमान वर्धा येथे 45 अंश सेल्सिअस नोंदले गेले. विदर्भाच्या काही भागांत पुढील चोवीस तासांमध्ये उष्णतेची लाट निर्माण होईल. सध्या विदर्भातील वेगवेगळ्या शहरांमध्ये 43 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेला कमाल तापमानाचा पारा आणखी उसळण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील प्रमुख नऊ शहरांपैकी सर्वांत कमी तापमान बुलडाणा येथे 41.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. गोंदिया 43 ,नागपूर 44.4,यवतमाळ 43,ब्रम्हपूरी 44.2,च्रंदपूर 44.8 याप्रमाणे इतर शहरांमधील पारा 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. वायव्य भारतात उन्हाचा चटका वाढला आहे. तेथून येणारे उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. महाराष्ट्रासह भारताचा बहुतांश भाग या वाऱ्याने व्यापला असून या भागातील उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्याच वेळी हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी आहे. त्याचा थेट परिणाम तापमानवाढीवर झाला आहे.