मुंबई,दि.24(विशेष प्रतिनिधी) – आजपासून राज्याच्या विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधीपक्षाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रूपये मदत देण्याची भाजपाची मागणी आहे. भाजपाकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा – विरोधीपक्ष नेते
यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारने दिलेले एकही आश्वासन पुर्ण केले नाही. अवकाळी झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली नाही. कर्जमुक्ती करतो सांगितले पण कर्जमाफी केली नाही. महिलांवरचे अत्याचार देखील वाढले आहेत. त्याबाबत सरकारची संवेदनशीलता कुठेही दिसत नाही. आज त्यासंबंधी विषय आम्ही सभागृहात मांडणार आहोत. सरकारला मंत्र्यांसाठी 18 मजल्याची इमारत बांधायची की 36 ची बांधायचे त्यांनी ठरवावे, पण शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यासोबतच प्रविण दरेकर यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेकऱ्यांच्या बांधावर जाऊन आश्वासन दिले होते की त्यांना कर्जमाफी दिली जाईल. पण तस होताना दिसत नाही. 35 लाखांपैकी केवळ 1 टक्के लोकांना कर्जमाफी दिली जाते आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. आज सूरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत आवाज उठवण्यासाठी पहिल्याच दिवशी विरोधा पक्षाकडून स्थगन प्रस्ताव देखील मांडण्यात येणार असल्याची माहीती प्रविण दरेकर यांनी दिली आहे.





