धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्व मिळून मार्गी लावू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
62

मुंबई, दि. 2 : अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही राज्यातील सगळ्यांची भावना आहे. त्यांना आरक्षाण मिळवून देण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रितपणे केंद्राकडे पाठपुरावा करू आणि हा प्रश्न मार्गी लावू असे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय हा गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहे. या विषयावर परस्पर मतभेद दूर ठेऊन सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारितला आहे. तेव्हा आपण एकत्रितपणे केंद्राकडे जाऊन या समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.

या देशातील जे समाज आजही वंचित आहेत त्यांच्या कल्याणासाठी सरकार काम करेल. या समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक ते सर्व  केल्या शिवाय मी राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली.उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री रामहरी रुपनवर, प्रविण दरेकर, महादेव जानकर, जयंत पाटील, शरद रणपिसे, विनायक मेटे आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.