धाराशिव उद्योग – गुंतवणुकीसाठी सज्ज ; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा
गुंतवणूक परिषदेचे पालकमंत्र्यांनी केले ऑनलाइन उद्घाटन
धाराशिव,दि.२५ ऑगस्ट -जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठ्या संधी असून जिल्हा उद्योग,गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी सज्ज आहे.स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून उद्योग उभारावेत,स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करावे,असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
आज धाराशिव येथे आयोजित ‘जिल्हा गुंतवणूक परिषद– धाराशिव २०२६’चे पालकमंत्री सरनाईक यांनी ऑनलाइन उद्घाटन केले.परिषदेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,श्रीमती.धनश्री जाधव समन्वय अधिकारी (मैत्री कक्ष) मुंबई तथा उपनिबंधक भागीदारी संस्था विधी व न्याय विभाग,श्री संजय भुरेवाल सहाय्यक आयुक्त,छत्रपती संभाजीनगर विभाग, श्री.अमर पाटील अध्यक्ष,धाराशिव सहकारी साखर कारखाना,श्री बाळासाहेब गीते,संचालक MAFPCO,कळंब श्री.सुयोग अमृतराव,डायरेक्टर मॅनेजमेंट कॉलेज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र,धाराशिव,श्री शिवराम तोतेवाड,व्यवस्थापक,सीडबी, श्री.देवा सुरवसे Export Branch,पोस्ट ऑफिस, धाराशिव,श्री.मनोज घायाळ, डिजिटल मार्केटिंग,श्री.राजाभाऊ कोंढारे, अध्यक्ष,लघुउद्योग भारती संघटना, धाराशिव यांची प्रमुख उपस्थिती होती.
धाराशिवच्या आर्थिक परिवर्तनाची नवी सुरुवात म्हणून या गुंतवणूक परिषदेकडे पाहिले पाहिजे असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की कृषी,कृषीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया,अक्षय ऊर्जा,पर्यटन तसेच सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते.“या परिषदेत ३७ उद्योगांसोबत तब्बल ७ हजार ५३४ कोटी ८५ लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यातून सुमारे ७ हजार ५०० रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.ही केवळ आकडेवारी नसून धाराशिवच्या हजारो कुटुंबांच्या आशा आणि तरुणांच्या रोजगाराच्या संधी आहेत,असे श्री. सरनाईक यांनी सांगितले. यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभारही त्यांनी मानले.श्री.सरनाईक पुढे म्हणाले की, कृषीप्रक्रिया व अन्नप्रक्रिया उद्योग,स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ,तसेच वारा व सौरऊर्जा क्षेत्रात मोठ्या संधी आहेत.





