“राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मुख्यमंत्रीपद सांभाळणं सोपं नाही”

0
47

औरंगाबाद | इतर धर्मीयांचा द्वेष करणे हे आमचे हिंदुत्व नाही. भाजपच्या प्रवक्त्यांनी प्रेषितांचा अपमान केला. त्यामुळे जगभर आपली निंदा झाली. आखाती देशांनी भारताला माफी मागायला भाग पाडले. आपल्या पंतप्रधानांचा फाेटाे कचराकुंडीवर लावण्यात आला. चूक भाजपने करायची अन‌् त्याची शिक्षा देशाला हे आम्हाला मान्य नाही. भाजप नेते नेहमीच हिंदुत्वावर बोलतात. एकदा समोरासमोर येऊन हिंदुत्वासाठी त्यांनी काय केले व आम्ही काय केले याचा सोक्षमोक्ष लावून टाकू,’ असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर बुधवारी सायंकाळी उद्धव ठाकरेंची ‘स्वाभिमान सभा’ आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली आहे.मुख्यमंत्री पद सांभाळणे तेही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सोप नाही. जे वैरी होते ते मित्र झाले आहेत. ज्या शिवसेना प्रमुखांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं आहे. ती शिवसेना तुमच्या डोळ्यात खुपायला लागली आहे. इतकी वर्षे ज्यांनी तुम्हाला जोपासलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

2 लाखांपर्यंत कर्ज आपल्या महाविकास आघाडी सरकारने माफ केलं आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अशा योजना आणत आहे की, शेतकरी घाबरला पाहिजे योजनेचा लाभ घ्यायला. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर आम्ही बांधावर जातो. आम्ही जे आहोत शेतकऱ्यांना बांधिल आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढायच्या. धर्माच्या नावावर अफूची गोळी देतात. देशातील सर्व पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि कोणत्या मुद्यावर बोलायचं ते सांगा, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली. पेट्रोलचे दर एवढे वाढावायचे आणि आक्रोश झाल्यावर कमी करायचे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. महाराष्ट्रातल्या मुलामुलींना इतर राज्यामध्ये रोजगारासाठी जाण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकार काम करत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

द्धव ठाकरेंनी जाहीर सभेत सोडलेले शब्दबाण!
– औरंगाबादचे नामांतर होणारच आहे, मात्र त्यापूर्वी महाराजांना अभिमान वाटेल असे शहर बनवणार आहे.

– राज्यात मोठी गुंतवणूक आणण्याचा आम्ही प्रयत्न करताेय, मात्र विरोधक राज्याची प्रतिमा खराब करत आहेत.

– पाण्यासाठी जलआक्रोश मोर्चा काढणाऱ्यांचा खरा आक्रोश सत्ता गेली म्हणून आहे.

– आमचे हिंदुत्व गदाधारी आहे. ‘गधा’धारी नाही. कारण गधे आम्ही आता बाजूला सारलेत.

मोहन भागवतांच्या वक्तव्याचे स्वागत

मध्यंतरी मी संघाबद्दल बोललाे, पण टीका केल्याचा आरोप झाला. भाजपच्या सभेला हे लाेक भगव्या टाेप्या घालून येतात. भगव्या टाेप्या घालून हिंदुत्व सिद्ध होत असेल तर मग संघ काळ्या टाेप्या का घालतो, असे मी विचारले. संघ त्यांची मातृतसंस्था आहे. तुम्ही जे काही शिकवत आहात ते तुमचीच कार्टी (भाजप) समजून घेत नाहीत. त्यांच्या कानाखाली वाजवण्याचा अधिकार मातृसंस्थेला अहे. मध्यंतरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शाेधू नका हे सांगितले, ते योग्यच झाले. नाही तर निवडणुका आल्या की भाजपचे लाेक धर्माची अफूची गाेळी देऊन मते मिळवतात, असा आरोपही ठाकरेंनी केला.