भाजपचा दारूण पराभव होणार- शरद पवार

0
9
मुंबई,दि.२७: – सत्ता येते अन् जाते पण सध्या राज्यातील व देशातील घडामोडी पाहता सत्ताधा-यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. सत्तेत असल्यावर जमिनीवर पाय ठेवावे लागतात. मात्र, ठाण्यातील परमार प्रकरण असो की महिला पोलिसाला मारहाण असो भाजप-शिवसेना डोक्यात सत्तेची हवा गेल्यासारखे वागत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. आगामी काळात देशातील विविध 5 राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. या सर्व राज्यांत भाजपचा दारूण पराभव अटळ आहे असे भाकीतही पवार यांनी वर्तवले.
शरद पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक आज  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
पवार म्हणाले, सध्या देशात वेगवेगळ्या घटना घडत आहेत, घडविल्या जात आहेत. जेएनयू प्रकरण हे ताजं उदाहरण. आम्हीच (भाजपवाले) फक्त राष्टभक्त आहोत आणि इतर बाकी सगळे राष्ट्रविरोधी आहोत असे भासवले जात आहे. जेएनयु वाद हे एक राजकीय षडयंत्र आहे. हिंदुत्ववादाची बिजं पेरून भाजप निवडणुकांना सामोरे जाण्याच प्रयत्न करतेय पण यातून भाजपच्या हाती काहीही लागणार नाही असे पवारांनी सांगितले.