राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार काल जाहीर करण्यात आली. महायुतीचे घटकपक्ष भाजपने तीन, शिवसेना (शिंदे गट) एक आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) एक असे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून एक उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. महायुतीमधील भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा गाडगीळ आणि डॉ.अजित गोपचडे यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी ( अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर करण्यात आले. धक्कादायक म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा खासदारकीची तीन वर्ष बाकी आहेत. त्यानंतरही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यामुळे विविध चर्चांना सुरूवात झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी का देण्यात आली याबद्दल त्यांनी माध्यमांसमोर भाष्य केले. ‘प्रफुल्ल पटेल यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि ते अपात्र ठरू नये यासाठी अजित पवार यांच्या गटातून त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली ‘ असे राऊत म्हणाले. या मुद्यावरून त्यांनी टीकाही केली.
काय म्हणाले संजय राऊत ?
पटेल यांची खासदारकी 2027 पर्यंत
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची मागणी होत होती. तसेच नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झालेले बाबा सिद्दिकी यांचे नाव आले होते. पार्थ पवार यांच्यासाठी तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आक्रमक होते. त्यांनी पार्थ पवार यांना उमेदवारी न दिल्यास बंड पुकारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली. प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभा खासदारकी 2027 पर्यंत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राज्यसभेत प्रफुल्ल पटेल एकमेव खासदार आहे.
पटेल यांना संधी का ?
राष्ट्रवादी काँग्रेमधील बंडखोरीनंतर शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यांनी पटेल यांची राज्यसभा खासदारकी रद्द करण्याची मागणी राज्यसभा सभापतींकडे केली आहे. त्याचा निकाल आल्यास आणि पटेल यांचे सदस्यत्व रद्द झाल्यास पटेल यांची खासदारकी रद्द होणार आहे. यामुळे प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्याची खेळी अजित पवार यांनी घेतली. तांत्रिक कारणामुळे पटेल यांना उमेदवारी दिल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.