भाजप सरकार मागासवर्गीय विरोधी-अँड. जयदेव गायकवाड

0
7

भंडारा,दि.18 : भाजप केंद्र व राज्यात सत्तेत आल्यापासून मागासवर्गीय, दलीत व महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे. जातीयवादी प्रकरणांना खतपाणी घालुन समाजात तेढ निर्माण केला जात आहे. दलित व मुस्लिमांना टारगेट करण्याचा प्रकारही सुरू आहे. हा अन्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही. भाजप सरकार हे मागासवर्गीय विरोधी आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अँड. जयदेव गायकवाड यांनी केला.
येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी राकॉचे सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, प्रवक्ता अतुल लोंढे, राकाँचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, डॉ. रविंद्र वानखेडे, प्राचार्य सच्चिदानंद फुलेकर आदी उपस्थित होते. अँड. गायकवाड म्हणाले, भाजपच्या राज्यात कायद्याचा वचक राहिलेला नाही. देशातील जे वातावरण चांगले नाही. सामाजिक, आर्थिक प्रश्न सोडविणे कठीण झाले आहे. नागरिकांवर हिंदुत्ववादी विचारसरणी लादली जात आहे. ही दलित व मुस्लिमविरोधी निती असल्याचेही अँड. गायकवाड म्हणाले.
गुजरातमध्ये दलितांवर अन्याय केला जात आहे. मुंबई येथे निर्माण करण्यात येणारे विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेबांचे स्मारक एकात्मिक घटक योजनेतून करण्यात येत आहे. स्मारक निश्‍चितपणे झालेच पाहिजे, परंतु त्यासाठी विशेष निधीची तरतूद का करण्यात आली नाही. मागासवर्गीयांया कल्याणासाठी असलेला निधी स्मारकासाठी वळते करण्याचा कुटील डाव शासनाने खेळला आहे. यासारख्या अन्य समस्यांवर उपाय म्हणून मागासवर्गीयांना सत्तेत सहभागी करून लोकशाहीला बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यस्तरीय जनजागृती अंतर्गत राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. भंडारा येथेही १७ ऑगस्टला मेळावा आजोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून आगामी नगरपालिका, महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक आदींबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहितीही अँड. गायकवाड यांनी दिली.