पाटणा – बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महाआघाडी फुटीच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले आहे. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले. लालू यादव म्हणाले, ‘ नितीशकुमारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेला नाही. या प्रकरणात मीडियालाच अधिक स्वारस्य आहे. नितीशकुमार आमचे नेते आहेत. ‘महाआघाडीत फूट’ या मीडियातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आहेत.’
राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर लालू यादव म्हणाले, ‘बिहार सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. महाआघाडीत काहीही चलबिचल नाही. सगळ्या मीडियाच्या अफवा आहेत. नितीशकुमारांनी तेजस्वींचा राजीनामा मागितलेला नाही.’ तेजस्वी यादवही म्हणाले की मला कधीही राजीनामा मागितला गेला नाही. नितीशकुमारांनीही आज आमदारांची बैठक बोलावली आहे.