भारतीयांचे स्वप्न भंगले;ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता,ट्रेव्हिस ठरला विजयाचा नायक

0
2

विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २४० धावा केल्या होत्या.ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने दमदार फलंदाजी करत सामन्यात रंगत आणली.

*अहमदाबाद :-ट्रेव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आणि वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा संघ २४० धावांवर ऑल आऊट झाला होता. यावेळी ट्रेव्हिसच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामान सहजपणे जिंकला आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने यावेळी भारतावर सहा विकेट्स राखून विजय मिळवला.

मोहम्मद शमीने पुन्हा एकदा आपल्या पहिल्या षटकात भारताला विकेट मिळवून दिली. शमीने डेव्हिड वॉर्नरला बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराने मिचेल मार्श आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांना बाद केले. त्यामुळे पहिल्या पॉवर प्ले मध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर अंकुश ठेवला होता. कारण भारताने सात षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाची ३ बाद ४७ अशी अवस्था केली होती. त्यानंतर भारताचे फिरकी गोलंदाज संघाला विकेट्स मिळवून देतील, असे वाटत होते. पण रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी यावेळी अपेक्षाभंग केला. कारण ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकी भागीदारी रचली आणि त्यामुळे त्यांना विजयासमीप पोहोचता आले. हेडने तर यावेळी दमदार शतक झळकावले आणि आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. हे दोघे ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून देणार असे वाटत होते.

प्रथम फलंदाजी करताना भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्माने धडाकेबाज फटकेबाजी करत ४७ धावांची खेळी साकारली. त्यानंतर विराट कोहलीने ५४ धावांची खेळी साकारली आणि पुन्हा एकदा दमदार खेळी साकारली. पण अर्धशतकानंतर तो जास्त काळ टिकू शकला नाही. कोहलीला यावेळी फायनलमध्ये शतक झळकावण्याची संधी होती. पण यामध्ये तो अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कोहली बाद झाला आणि भारताला संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी लोकेश राहुल भारताच्या मदतीला धावून आला. कारण राहुलने संयत खेळी करत यावेळी फक्त एकाच चौकाराच्या जोरावर ६६ धावा केल्या. त्यामुळे भारताला यावेळी २०० धावांचा पल्ला गाठता आला. अखेरच्या षटकांत भारताला मोठी फटकेबाजी करता आली नाही आणि त्यामुळेच त्यांना २४० धावांवर समाधान मानावे लागले.

भारतीय संघ या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण या सामन्यात फलंदाजांनी साफ निराशा केली आणि त्यामुळेच त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.