
नवी दिल्ली-केंद्रीय स्तरावर सातत्याने प्रयत्न करूनही बँकिंग घोटाळ्यांवर लगाम लावण्यात यश आलेले नाही. या घोटाळ्यांनी केवळ बँकांच्याच नव्हे, तर सामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवरही पाणी फेरले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बँकिंग घोटाळे व फसवणुकीत देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबई राजधानी असलेला महाराष्ट्र अव्वलस्थानी असून देशाची राजधानी दिल्ली दुसऱ्या स्थानी आहे. तेलंगण तिसऱ्या, गुजरात चौथ्या तर तामिळनाडू पाचव्या स्थानावर आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या अहवालानुसार, गेल्या सात वर्षांत बँकिंग घोटाळ्यांमुळे रोज १०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. अर्थात दरवर्षी अशा फसवणुकीच्या किंवा घोटाळ्यांची रक्कम कमी होत चालली आहे. मात्र, अशा एकूण घोटाळ्यांतील रकमेपैकी ५० टक्के रकमेचे घोटाळे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. म्हणजेच एखादे राज्य आर्थिकदृष्ट्या जेवढे समृद्ध तेवढे तेथे घोटाळे अधिक आहेत. गेल्या ७ वर्षांत या राज्यांमध्ये २ लाख कोटींहून अधिक रकमेचे घोटाळे झाले असून हे प्रमाण देशातील एकूण घोटाळ्यांच्या ८३ टक्के आहे.
रिझर्व्ह बँकेनुसार, १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान देशात अडीच लाख कोटींचे घोटाळे झाले. २०१५-१६ मध्ये ६७,७६० कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले होते. २०१६-१७ मध्ये ते कमी होऊन ५९,९६६ कोटींवर आले. २०१९-२० मध्ये २७,६९८ कोटी तर २०२०-२१ मध्ये १०,६९९ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची प्रकरणे नोंदवली गेली. चालू आिर्थक वर्षात पहिल्या ९ महिन्यांत अशा घोटाळ्यांची रक्कम फक्त ६४७ कोटी रुपये आहे.





