आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा;उद्धव ठाकरे

0
44

मुंबई:-बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आव्हान आता मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं असून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.आपण ज्यांना मोठं केलं, त्यांची स्वप्नं मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत नाही. शिंदेंच्या या बंडामागे भाजप असल्याचा आरोपही त्यांनी केला. आतापर्यंत जे भाजपसोबत गेलेत ते संपलेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आपल्यासोबत आता कोणीही नाही असं समजून काम करा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु असून यावेळी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांशी संवाद साधला. हा भाजपाचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. भाजपासोबत जाण्यासाठी दबाव असल्याचा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

“करोनाचं संकट गेल्या दोन वर्षांपासून मागे लागलं आहे. करोनाचा त्रास संपत असतानाच मानेचा त्रास सुरु झाला आहे. कोणती व्यक्ती कोणत्या वेळी आपल्याशी कशी वागली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

👉👉मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

➖वर्षा की मातोश्री असं झोपेतही विचारलं तर उत्तर असेल मातोश्रीच.

➖आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते, आणि आम्ही बडवे होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे.

➖नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असतं, पण मी ते एकनाथ शिंदे यांना दिलं.

➖यांच्या मुलाला खासदार केलं मग माझ्या मुलाने काहीच करायचं नाही का?

➖आपण ज्यांना मोठं केलं, त्यांची स्वप्न मोठी झाली, ती मी पुरी करू शकत नाही.

➖महत्त्वाकांक्षा असावी, पण ज्यानं दिलं त्यालाच खावं अशी महत्त्वाकांक्षा नसावी.

➖बंड झाल्यानंतरही शिवसेना दोन वेळा सत्तेत आली.

➖कितीही आमदार घेऊन जा, शिवसेनेला काहीही होणार नाही

➖काही आमदार म्हणाले होते की तिकीट कापलं तरी आम्ही सोडून जाणार नाही.

➖फंड मिळाला नाही म्हणून तक्रारी केल्या. मी सगळ्या पातळीवर फंड देत आलो.

➖मातोश्रीवर घाणेरडे आरोप केल्यानंतर मी शांत बसणार नाही.

➖आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा.

➖या सगळ्यामागे भाजपचा हात, आतापर्यंत जे लोक भाजपसोबत गेलेत, ते संपले आहेत.

➖बाळासाहेबांचा मुलगा आहे हे विसरून जा आणि माझ्यासमोर या.

➖मी आता राजीनामा द्यायला तयार आहे, पण समोर येऊन सांगा

➖कोण कोणत्यावेळी कसं वागलं आहे हे लक्षात ठेवा.

➖त्या दिवशी मी मनातलं सांगितलं, आज मन मोकळं करतोय.

➖मी वर्षा सोडली म्हणजे पण जिद्द सोडली नाही.