नक्षल्यांनी केली दोघांची हत्या

0
13

गडचिरोली, : पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी आज पहाटे धानोरा तालुक्यातील पेंढरी उपपोलिस ठाण्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील मासानदी या गावी दोन जणांची हत्या केली. देवजी मिठू आतला(५५) व शेषराव बग्गा दर्रो(४५) दोघेही रा.मासानदी अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, नक्षल्यांनी अंतर्गत कलहातून दोन निष्पाप आदिवासींची हत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

काल रात्री सशस्त्र नक्षल्यांनी देवजी आतला व शेषराव दर्रो यांना झोपेतून उठवून गावाबाहेर नेले. त्यानंतर जंगलात बेदम मारहाण करुन त्यांची हत्या केली. मासानदी परिसर छत्तीसगड सीमावर्ती भागात असून, हा परिसर अतिसंवेदनशील आहे. बऱ्याच दिवसांपासून या भागात शांतता होती. परंतु नक्षल्यांनी दोघांची हत्या केल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेषराव दर्रो हा नक्षलप्रणीत ‘जनताना सरकार’चा उपाध्यक्ष, तर देवजी आतला हा सदस्य होता. दोघेही दीर्घ काळापासून नक्षल चळवळीत काम करीत होते. काल रात्री १५ ते २० सशस्त्र नक्षलवादी मासानदी गावात गेले. त्यांनी दोघांना गावाबाहेर नेले. ‘तुमच्या पार्टीविरोधी कृतीमुळे गावातील संघटन मागे पडत आहे. तुम्हाला वारंवार सांगूनही तुमच्या हालचालीत काहीही सुधारणा झाली नाही’, असे म्हणून नक्षल्यांनी दोघांना बेदम मारहाण केली आणि नंतर दोघांची हत्या केली.