पुणे – गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कुठं रेड, तर कुठं ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापूरला रेड अलर्ट,तर कोकणसह पुणे साताऱ्यात ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं कोल्हापुरात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 3 दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता
आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. 4 ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.
या 14 जिल्ह्यात पडणार अति जोरदार पाऊस
माणिकराव खुळे यांना दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 14 जिल्ह्यात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील मुंबईशहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनं प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.