रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला;९ फेब्रुवारीपर्यंत चिकनची दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0
16

उरणमध्ये १ हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट
रायगड :– जिल्ह्यातील उरणमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या कोंबड्या या मृत पावत होत्या. त्यामुळे या कोबड्यांना तपासणीसाठी पाठवले असता कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. त्याच्यासोबत अंडी देखील नष्ट करण्यात आली आहेत. तसेच या घटनेनंतर या परिसरातील चिकनची दुकाने ९ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यासोबत नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आले आहे.

उरण मधील चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या मागील काही दिवसापासून कोंबड्या मृत पावत होत्या. त्यामुळे शासनाच्या पशू पालन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता काही कोंबड्यांच्या मृत्यू संशयास्पद वाटल्याने कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी भोपाळ आणि पुणे येथे पाठविण्यात आल्याने त्यातील काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता चिरनेर परिसरातील 10 किलोमिटर अंतरावर सर्व गावांना आपल्याकडील कोंबड्या आणि त्यापासून मिळालेली अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

गावात जाऊन पशू वैद्यकीय अधिकऱ्यानी अशा हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली असून पुढील कारवाई सुरू आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लुची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून गावातील 1 हजाराहून अधिक कोंबड्या तसेच अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. 1 किलोमिटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलाय. या परिसरातील चिकनची दुकाने 9 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आले आहे.