शिवसेनेचा आता थेट मुख्यमंत्र्यांशीच ‘सामना’

0
11

मुबंई- जे दाभोलकर प्रकरणात झाले तेच पानसरेप्रकरणी घडत आहे. कथा, पटकथा व संवाद बदलले नाहीत. नायक, खलनायक बदलून जुन्याच पटकथेवर नवा सिनेमा सुरू असल्याची खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर प्रथमच थेट टीका केल्याने युतीत सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी ‘राज्यात नवीन काय चालले आहे?’ असा सवाल उपस्थित करीत भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे खुनी अद्याप मोकाट असल्याने व मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना अग्रलेखात म्हटले आहे की, अठरा महिन्यांनंतरही दाभोलकरांचे मारेकरी सापडलेले नाहीत व कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे खुनी अद्यापही मोकाटच आहेत. दाभोलकरांचा खून झाला तेव्हा तत्कालीन गृहमंत्र्यांचा राजीनामा जोरात मागितला गेला होता. आता विरोधक नेमके तेच करीत आहेत. पानसरे यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे आश्‍वासन गृहखाते सांभाळणार्‍या मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा कॉंग्रेसचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी नेमके हेच आश्‍वासन दिले होते की, ‘‘दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू.’’ पण दाभोलकरांचे मारेकरी अजूनही गायब आहेत व पानसरे यांच्या मारेकर्‍यांसंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी तेच विधान केले. पानसरे यांच्या मारेकर्‍यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आणखी एक जोरकस विधान केले आहे ते म्हणजे ‘‘पोलिसांनी ताकद लावली तर आरोपी पकडण्यात निश्‍चित यश मिळेल!’’ मुख्यमंत्र्यांचे हे विधान गमतीचे आहे व पोलिसांवर खापर फोडणारे आहे. ज्या पोलिसांवर ते अविश्‍वास दाखवीत आहेत ते गृहखाते स्वत: मुख्यमंत्री सांभाळीत आहेत. पोलिसांनी जोर लावावा म्हणजे नेमके काय करावे? याबाबत नामदार मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले नाही. पानसरे यांचे खुनी शोधण्यात पोलीस चालढकल करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते अपयश गृहखात्याचे आहे, असे सांगत थेट गृहखाते संभाळणा-या फडणवीस यांच्यावरच शरसंधान केले आहे.
पानसरे यांचे खुनी सापडत नाहीत हे ‘सिस्टीम’चे म्हणजे व्यवस्थेचे अपयश असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून फडणवीस यांच्यावर टीका करताना अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, जनतेने सरकार बदलले आहे, तुम्ही ‘सिस्टीम’ बदला. ती बदलता येत नसेल तर अपयशाचे खापर दुसर्‍यांवर फोडण्याआधी त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करा. आत्मचिंतन करा असे आम्ही सुचवणार नाही. कारण कायदा व सुव्यवस्था हा विषय चिंतनाचा नसून कृतीचा आहे. दाभोलकरांचे खुनी शोधण्यासाठी पोलिसांनी तेव्हाही जंग जंग पछाडलेच होते व आता पानसरे यांचे खुनी शोधण्यासाठीदेखील पोलीस शर्थ करीत आहेत. मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी बदलले, पण प्रशासकीय व्यवस्था तीच आहे. राज्यकर्ते येत जात असतात, ‘सिस्टीम’ तीच असते. मुख्यमंत्र्यांना ती मान्य नसेल तर त्यांनी सिस्टीमचा चेहरा बदलायला हवा. सरकार बदलले, पण महाराष्ट्रात काय बदलले? हा प्रश्‍न कायम आहे व उद्या हा प्रश्‍न आपल्याला जनता विचारणार आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. दाभोलकरांप्रमाणे पानसरे यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाली आहे. राजू शेट्टी व त्यांची शेतकरी संघटना सरकारवर आगपाखड करीत हिंसक आंदोलने करीत आहे. हे सर्व यासाठी सांगायचे की, सत्ता आपल्या हाती आहे. तेव्हा ‘सिस्टीम’वर खापर फोडून चालणार नाही. सिस्टीम ही धावणार्‍या व उधळणार्‍या घोड्यासारखी असते. त्यावर घट्ट मांड ठोकून बसेल तोच राज्य चालवेल, असे सांगत मुख्यमंत्र्यांना अधिक कार्यक्षम होण्याचा सल्ला दिला आहे.