कोविड काळात कुटुंबातील कर्ता गमावलेल्या महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण

0
19

अमरावती, दि. १२ : कोविड  प्रादुर्भावात जिल्ह्यातील अनेक कुटुंबियांनी प्रमुख कर्ता व्यक्ती गमावला. अनेक कुटुंबांचा आधार तुटलेला आहे. या महिलांना सर्व संकटांना पेलून आपल्या मुलाबाळांसाठी एक नवी सुरुवात करावी लागणार आहे. माविमच्या माध्यमातून या महिलांना रोजगार, स्वयंरोजगार, प्रक्रिया उद्योगाचा आधार मिळणार आहे, असे सांगून उपस्थित महिलांचे मनोबल राज्याच्या बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी वाढविले.

 

ग्रीव्ह इंडिया, सहयाद्री फाउंडेशन व लाईफ फर्स्ट यांच्यावतीने ‘एक हात मदतीचा’ कार्यक्रम बचत भवन येथे आयोजित करण्यात आला. कोविडमुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले.

 

माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, माविमचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे, गोंदिया येथील माविमचे जिल्हा समन्वयक संजय संगईकर जिल्हा उद्योग केंद्राचे सांगोळे, लाईफ फर्स्ट फाउंडेशनचे संचालक विजय क्षीरसागर, कौशल्य विकास योजनेचे प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.

 

सातारगाव,धामणगाव,लेहगाव,मोर्शी,खोपडा,पुसदा,चांदुर रेल्वे,नांदगाव खंडेश्वर,बेनोडा,शेंदुर्जना घाट, अंजनगाव सुर्जी, शिराळा आदी गावातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना धनादेशचे  वाटप श्रीमती ठाकूर यांनी केले.

 

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते  धनादेश वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबियांना, त्यांच्या वारसांना शासनाकडून वीस हजार रुपये प्रमाणे मदत प्रदान करण्यात येते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, तहसीलदार संजय काकडे आदी यावेळी उपस्थित होते.  13 लाभार्थ्यांना श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले.

राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत तिवसा तालुक्यातील खालील लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.माहुली जहागीर येथील सोनाली उमक, मंदा बावने व वर्षा गुलहाने, ब्राम्हणवाडा येथील इंदिरा मरसकोल्हे, रामगावच्या शुभदिनी इंगळे, यावली शहिदच्या शेख कमरून शेख रहमान व प्रीती बोराडे, वाघोली येथील सविता सावरकर व काजल नाईक, नांदगाव पेठ येथील पुष्पा पोहनकार, वलगाव येथील विशाखा भगत, रहाटगावच्या अरुणा आठवले आणि पिंपरी येथील वैशाली महल्ले आदी उपस्थित होते.