कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांच्या पाठिशी भावासारखे उभे रहा- अपर जिल्हाधिकारी राजेश खवले

0
43
  • मिशन वात्सल्यचा आढावा
    योजनांचा प्राधान्याने लाभ द्या
    कौशल्य विकास कार्यक्रम राबवा

          गोंदिया,दि.२१ : घरातील कर्ता माणूस कोविडमुळे गेला हे दुःख त्या महिलेसाठी डोंगराएव्हढे  आहे. अधिकारी म्हणून आपण अशा प्रकरणांमध्ये संवेदनशील होऊन काम करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध विभागाच्या योजना या विधवा भगिनींना प्राधान्याने मिळायला हव्यात. कोविड प्रकोपामुळे विधवा झालेली महिला ही आपली बहिणच आहे या भावनेने त्यांच्या पाठीशी उभे राहून आपल्यातील संवेदनशीलतेचा परिचय करून द्या, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सर्व यंत्रणांना केले.

        जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘मिशन वात्सल्य’ योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

         मागील दोन वर्ष सर्व जगाने ‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराशी लढा दिला. या लढ्यात अनेकांनी आपले स्वकीय व आप्त गमावले. गोंदिया जिल्ह्यातील 304 महिलांनी आपले पती या महामारीत गमावले. अशा एकल किंवा विधवा झालेल्या महिलांसाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती.

          शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना विविध विभागामार्फत राबविल्या जातात. अशा योजनांचा लाभ या महिलांना प्राधान्याने देण्यात यावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. श्री. खवले पुढे म्हणाले की, अशा प्रकारच्या घटनेत अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशील होवून काम करणे आवश्यक आहे. अशा दुःखाच्या प्रसंगी शासन व प्रशासन आपल्या सोबत आहे ही खात्री व विश्वास द्या.

         आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांचा लाभ या माता भगिनींना देण्यात यावा. ज्या महिलांवर असा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या महिला आपल्या पर्यंत पोहोचू शकणार नाहीत अशावेळी आपण स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची मदत करणे हाच ‘मिशन वात्सल्य’ योजनेचा खरा उद्देश आहे. या योजनेत काय प्रगती झाली याचा दर गुरुवारी आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाने लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय यादी प्रत्येक गुरुवारी सादर करावी असे निर्देश दिले.

         यातील अनेक महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्यात यावे. सकारात्मक होऊन ही काम केली जावीत. केवळ ऑनलाईन अर्ज भरला नाही म्हणून या महिलांना लाभापासून वंचित न ठेवता प्रसंगी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या यंत्रणेने त्यांना मदत करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. ही विधवा महिला आपली बहीण आहे असे समजून त्यांना मदत करण्यात यावी. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही मदत अथवा सहकार्य लागल्यास ते स्वयंस्फूर्तीने करावे, त्यांच्या मदतीसाठी मोठा भाऊ म्हणून धावून जा असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मिशन वात्सल्य या योजनेत एकही महिला वंचित राहता काम नये, असे ते म्हणाले. पुढील बैठकीत लाभार्थी व योजना निहाय आढावा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.