वर्धा : गावांचा सर्वांगिण विकास शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून होतो. सरपंच, ग्रामसेवकांनी या योजनांचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी एककेंद्राभिमुखतेने त्याचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोदकुमार पवार यांनी केले.
समुद्रपूर येथे पंचायत समिती सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ‘योजना आपल्या द्वारी’ माहिती अभियान कार्यशाळा 2016 च्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक श्रीपाद अपराजित यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती नंदाताई साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मेसरे आदींची उपस्थिती होती.